

संगमनेर: वारस असताना नातेवाईकांनी बनावट कागदपत्र तयार करून चिंचोली गुरव येथील शेतीचे परस्पर वाटप केले. तर दैवकोठे येथील शेतीचेही बनावट कागद पत्राच्या आधारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अर्धी शेती केली. यातील काही शेती परस्पर विकुन फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अशोक सोनवणे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी अशोक बाबुराव सोनवणे यांचे तक्रारीवरून गणपत जगन्नाथ सोनवणे (श्रीरामपूर), विश्वनाथ दादा सोनवणे (पळसखेडे), शिवाजी राधु सोनवणे (घुलेवाडी), बाबुराव ऊर्फ बाबु दादा सोनवणे (राहाता), दत्तात्रय मुक्ताजी सोनवणे (राहाता), सुनिता विलास मुंगसे (देवकौठे) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक सोनवणे यांचे शेत गट नं 495(1) मधील एकुण क्षेत्र 1 हेक्टर 35 आर मधील ही शेती नातेवाईकांनी अशोक सोनवणे हे वारसदार असतांना सुद्धा तिसऱ्या व्यक्तीला कागदपत्राचे बनावटीकरण करुन तसेच खोटे कागदपत्र खरे आहेत असे सांगुन वाटप केले.
तसेच देवकौठे येथील शेत गट नं 144(1) मधील एकुण 7 हेक्टर 69 आर पैकी अशोक सोनवणे हे शेतीस वारसदार असताना कागदपत्राचे बनावटीकरण, खोटे कागदपत्र खरे आहेत हे समजावुन एकुण शेतीच्या क्षेत्रापैकी निम्मे भागुजी महादु सोनवणे यांचे वारसाचे नावावर केले व निम्मे नातेवाईकांनी नावावर करुन घेतले. तर सन 2024 मध्ये नातेवाईकांनी 140 (1) मधील मिळालेला निम्मा हिस्सा पैकी 2 हेक्टर शेतजमिन स्वतः चे नावावर करुन घेतली आहे.
त्यानंतर वाट्याला आलेले क्षेत्र त्यांनी सुनिता विलास मुंगसे यांना विकली आहे. नातेवाईकांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अशोक सोनवणे यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सातपुते करत आहेत.