

नगर: निवडणूक आयोगावर टीका करण्याची राहुल गांधी यांची फक्त नौटंकी सुरू असून, हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी, असा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की ज्यांना मतदारयाद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतक्या दिवस काय करीत होते खा. राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले. आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले ते का देत नाहीत. (Latest Ahilyanagar News)
फक्त मुक्ताफळ उधळण्याचे काम त्यांचे सुरू असल्याची टीका करून मतदारयाद्यांची काही प्रक्रिया असते. उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अशा प्रकारामुळेच काँग्रेसचे अस्तित्व संपत चालल्याचे विखे पाटील म्हणाले.
क्षेत्रीय स्तरावर नेमलेल्या समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाहीत तशा सूचनाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून,बोगस दाखले दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देऊन, कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही.
बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याचे लक्षात आल्यास ते तात्काळ रद्द होतील, ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांचीसुध्दा तीच मागणी असल्याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.मराठा समाजाच्या संघटनानी छत्रपती संभाजीनगर मध्ये घेतलेल्या परीषदेच्या संदर्भात प्रतिक्रीया देताना त्यांच्यकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू असे स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना मंत्री विखे यांनी सांगितले की,त्यांचे दिल्लीत जाणे हे मराठा अधिवेशनाच्या निमिताने असावे. अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही.सरकारने घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना बोलून दाखवली.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या संदर्भात कर्नाटक सरकराने परस्पर पावल उचलली तर राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल आशी भूमिका मंत्री विखे पाटील यांनी मांडली.