

पारनेर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गट व गण रचना 2017मध्ये अस्तित्वात असलेल्या जुन्याच स्वरूपात कायम ठेवावी, अशी मागणी खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात खा. लंके यांनी म्हटले आहे की, सन 2017मध्ये ज्या गट व गण रचनेच्या आधारे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडल्या, त्या रचनेमध्ये त्यानंतर कोणताही नवीन गट अथवा गण समाविष्ट करण्यात आलेला नाही. (Latest Ahilyanagar News)
परिणामी, नव्याने कोणतीही फेररचना करण्याची आवश्यकता नाही. गट व गण रचनेच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे निवडणुकांच्या पारदर्शकतेवर व निःष्पक्षतेवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे गट व गण रचनेत कोणतेही बदल न करता जुन्याच स्वरूपात ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खा. लंके यांनी म्हटले आहे की, गट व गण रचनेत कोणताही बदल न केल्यास जिल्ह्यातील सामाजिक समता व राजकीय स्थैर्य टिकून राहील. कोणत्याही वर्ग अथवा गटावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, अशी अपेक्षा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
या निवेदनावर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्याच्या स्थितीत पारदर्शक आणि न्याय्य निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी प्रशासनाने कोणते निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.