

चांदा: नेवासा तालुक्यातील चांदा कौठा ,फत्तेपूर, देडगाव परिसरात अवकाळीने तडाखा दिला असून गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तीन दिवसापासून चांदा, कौठा, फत्तेपूर, बालाजी देडगाव परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र गुरूवारी दुपारनंतर या परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह अवकाळीने तडाखा दिला. चांदा-मिरी रस्ता परिसरातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. कौठा, फत्तेपूर आणि बालाजी देडगावात मोठी गारपीट झाली आहे. पावसाने रब्बीची पिकं भुई सपाट झाले आहे. सर्वाधिक नुकसान गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, आंबा या फळबाग व पिकांचे नुकसान झाले आहे.
जोरदार गारपिटीमुळे गव्हाची ओंबी खाली गळून पडली. डाळिंब आणि आंब्याचे फुलोरा गळून पडला आहे. ऐण सोगंणीच्या वेळी गारपिटीने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही भागात आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या जमिनीवर पडल्या आहेत. डाळिंबाच्या पिकाचा फुलोरा गळून गेला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. गहू सोंगणीच्या तयारीत असतानाच अवकाळीने तडाखा दिला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार परिसरात रात्रंदिवस गव्हाची हार्वेस्टिंग सुरू होती. परंतु तरीही राहिलेल्या गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
बालाजी देडगाव, चांदा, फतेपुर, कौठा परिसरात अवकाळीतील गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीने काढणीस आलेल्या कांद्याला मोठा फटका बसणार आहे. कांद्याची वाढ थांबून कांदे नासण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी उत्पादन बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
संतोष तांबे, शेतकरी, बालाजी देडगाव
निघोज परिसरात गुरुवारी (दि.19) दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने शेतीमाल व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतमालाला भाव नाही त्यातही आखातातील युद्धाचा परिणाम भावावर झाला आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सरकारने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. निघोज परिसर व कुकडी डावा कालवा अंतर्गत परिसरात सध्या गहू, कांदा काढण्याचे काम सुरू आहे. काढलेला कांदा व गहू शेतातच ठेवला होता.
अचानक अवकाळी पाऊस वारा व गारपीठीने त्याचे नुकसान झाले. शिवडी, शिववाडी, मोरवाडी, रसाळवाडी, वडनेर, वडगाव गुंड भागात फळबांगांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. थकबाकीमुळे राष्ट्रीयकृत बँका व सोसायटीकडून कर्ज मिळत नसल्याने कांदा, गहू, फळबागांसाठी शेतकऱ्यांनी जादा व्याजाने पतसंस्थाकडून कर्ज काढले आहे. आता नुकस्ाान झाल्याने हे कर्ज फेडायचे कसे? या चिंतेत शेतकरी सापडला आहे. तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे केली आहे. आ. दाते यांनी नगर तालुक्यातील नांदगाव शिंगवे भागात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत पंचनामे करण्याची सुचना अधिकाऱ्यांना केली आहे.