

नगर: अहिल्यानगर एमआयडीसीत गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या तीव्र टंचाई जाणवत आहे. गॅस अभावी कारखान्यातील उत्पादने ठप होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या नियमित व पुरेसा गॅस पुरवठा होत नसल्याने उत्पादन प्रक्रियेत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
अहिल्यानगर एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण झालेल्या औद्योगिक गॅस टंचाईच्या गंभीर प्रश्नाबाबत असोसिएशन ऑफ अहमदनगर मॅनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीज (आमी) संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पंकजा आशिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उद्योजकांच्या विविध गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली.
गॅस टंचाईमुळे उद्योगांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटत असून ठरलेल्या वेळेत ग्राहकांना माल पुरविणेही कठीण होत आहे. परिणामी उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून उद्योगांच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होत असल्याची चिंता उद्योजकांनी व्यक्त केली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. गॅस टंचाईची ही परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास कायमस्वरूपी उत्पादन बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन संबंधित गॅस पुरवठादार कंपन्यांशी समन्वय साधून गॅसचा नियमित व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
यावेळी आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, सतीश गवळी, राजेंद्र शुक्रे, संदेश पिंपळकर, मिलिंद कुलकर्णी, गणेश कोलार, रामचंद्र भट, नागराज बडगिरी, प्रवीण खपके, प्रफुल्ल नातू, सिद्धार्थ संकलेच्या बालकृष्ण नरोडे, रोहन गांधी आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा औद्योगिकदृष्ट्या प्रगतिपथावर असलेला जिल्हा असून राज्य सरकार उद्योगवृद्धीसाठी विविध धोरणे व सवलती देत आहे. मात्र, अशा मूलभूत इंधन पुरवठ्यातील अडचणीमुळे उद्योगांच्या प्रगतीला गंभीर अडथळे निर्माण होत असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
जयद्रथ खाकाळ, अध्यक्ष आमी