

नगर: युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा मोठ्याप्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून, ग्राहकांना तास्नतास रांगे उभे राहवे लागत आहे. त्यासाठी गॅसचा कृत्रिम तुटवडा कमी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा. घरगुती ग्राहक, वसतिगृह व माध्यन भोजनासाठी गॅस पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी भाजपचे सरचिटणीस निखील वारे, मनपा गटनेत्या शारदा ढवण, महिला अध्यक्षा प्रिया जानवे, भरत ठुबे, उदय अनभुले, सुशांत जाधव, अजय ढोणे, राजू मंगलारप, सतीश शिंदे, विशाल नाकाडे, मयुरी जाधव, करण कराळे, रोहन सानप, संजय गायकवाड, विजय गायकवाड, रेणुका करंदीकर व राखी आहेर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांना जादा दराने गॅस घेण्यास भाग पाडले जात असल्याची शंका देखील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील जनतेमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून काळाबाजार करणाऱ्या गॅस वितरण संस्थांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.
गॅसचा काळाबाजार बंद करावा: मोहिते
अनिल मोहिते म्हणाले, गॅस तुटवड्याचा गैरफायदा घेत काही गॅस वितरण संस्थांकडून नागरिकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना तास्नतास उन्हातान्हात रांगेत उभे राहत आहेत. गॅस अभावी एमआयडीसीत कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करून काळाबाजार बंद करावा व नागरिकांना दिलासा द्यावा.
होम डिलिव्हरीसाठी पैसे मागतात: वारे
नगरसेवक निखील वारे म्हणाले, अहिल्यानगर शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅस सिलेंडर बुकिंग करूनही नागरिकांना वेळेत सिलेंडर मिळत नाहीत. सिलेंडरची होम डिलिव्हरी करणारे अतिरिक्त पैसे मागत आहेत.