

नेवासा: शेतीमालाला भाव नाही, मजुरीचा दरही परवडेना, अशा दुहेरी संकटांत शेतकरी सापडला आहे. आता उन्हाच्या चटक्यामुळे कांदा काढणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. मजुरांची मिन्नतवारी करावी लागत आहे. अवकाळीच्या वातावरणाची टांगती तलवार आहेच.
तालुक्यातील विविध गावांतील गहू सोंगण्या पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांनी काढलेला गहू आहे त्या भावात व्यापाऱ्यांना विकला. आता उन्हाळ्याचा पारा वाढला आहे. उकाडा वाढल्याने गहू पिकांची काढणी झाली. मात्र, कांदा पिकांना मजूर उन्हामुळे धजत नसल्याने मजुरी वाढली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये भाव नाही. मात्र, पिकांचा खर्च वाढत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रोजंदारीवर काम करण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही. ऊक्ते काम करण्यास मजूर अव्वाच्या सव्वा रक्कम सांगत आहेत. मजुरांची मनधरणी करावी लागत आहे.
काही ठिकाणी अवकाळी पावसाने थोडाफार गव्हाचा दर्जा घसरला आहे. या गव्हासाठी व्यापाऱ्यांनी वेगळा भाव ठरविला आहे. सध्या या भागात व्यापारी गहू खरेदी करताना प्रतिक्विंटल 2100 ते 2200 रुपयांपर्यंत खरेदी करीत आहेत. त्यात थोडा खराब असलेला गहू 2000 रुपयांनी खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना गहू पिकास उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
गहू काढणी झाल्यानंतर आता मजुरांकडून कांदा काढणी सुरू झाली आहे. सध्या या भागात कांदा काढणी सुरू असून मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली असताना पिकांना मिळणारा भाव मात्र तुलनेत कमी आहे. सध्या विविध गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रा सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी गहू विकून शेतकऱ्यांनी यात्रोत्सवातील खर्च भागविला.
गहू सोंगणी करण्यासाठी मजुरांनी एकरी दोन पोती गहू तर मजुरीवर एकरी 5 हजार ते 6 हजार असा मजुरीचा दर होता. कांदा काढणीसाठी हाच दर आता एकरी 10 ते 12 हजार रुपये आहे. रब्बी पिकांचे उत्पादन आणि खर्च याचा मेळ घालता घालता शेतकरी कमालीचा अडचणीत आला आहे. मात्र, उन्हाचा पारा चढल्याने मजुरांनी ही मजुरीचे दर वाढविले आहेत. तरीही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी गहू आणि अन्य पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतातून काढलेला शेतीमाल साठवून ठेवला होता. काही ठिकाणी हा शेतीमालही खराब झाला होता. त्यामुळे व्यापारी या शेतीमालाला कमी भाव देत आहे. काही ठिकाणी काही शेतीमालाला पुरवठा जास्त झाला आहे. त्यामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या शेतीमालाला अपेक्षित भाव नाही. गहू, कांदा आदी पिकांना भाव मिळत नाही. सध्याच्या परिस्थितीचा फायदा व्यापारी घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाची रक्कमही हातात येत नसल्याने आर्थिक गाडा रूतत चालला आहे.
महादेव आहेर, शेतकरी, भेंडा
सध्या अवकाळी पावसाचे दररोज वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे काढलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सकाळ-संध्याकाळ होताना दिसत आहे. मोठय़ा कष्टाने काढलेल्या कांद्याला भाव नाही. अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे व्यापारी देखील जागेवरच कांद्याचा भाव पडून मागत आहेत.
सचिन जाधव, गोंडेगाव, शेतकरी