

कोपरगाव: शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी मोकाट जनावरांच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही प्रशासनाने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न केल्यामुळे काही दिवसांपूर्वी मोकाट जनावरांच्या धडकेत जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा काल रविवारी (दि. १६) उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
या सलग दोन घटनांमुळे कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीच्या अडथळ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. नागरिकांचे कोपरगावच्या रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले आहे. विशेषतः शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक आणि वर्दळीच्या भागात जनावरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसलेले किंवा घोळक्याने उभे असतात. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहन चालकांना या जनावरांना पार करून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
मोकाट जनावरांमुळे सर्वाधिक धोका महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना निर्माण झाला आहे. अचानक समोर आलेल्या जनावरामुळे वाहनाचा तोल जाणे, अपघात होणे किंवा जनावराने थेट धडक देणे अशा घटना घडण्याची शक्यता कायम आहे. परिणामी, सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी बाहेर पडतानाही सावधगिरी बाळगावी लागत असून यापुढे घराबाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न पडला आहे.
एक घटना घडल्यानंतर देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा एका निरपराध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोपरगावकरांमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी वाढली आहे. मागील महिन्यात मोकाट जनावरांमुळे निष्पाप बळी गेल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र, कोपरगाव नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? असा प्रश्न कोपरगावकर पालिकेला विचारीत आहे.
दोन निरपराध नागरिकांचा जीव गेल्यानंतरही जर नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात आणखी एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोपरगाव नगरपालिका मोकाट जनावरांबाबत उपाययोजना कधी करणार? व त्यासाठी आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य कोपरगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. मोकाट जनावरांनी घेतला दुसरा बळी, कोपरगावकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.