Political News: स्नेहलता कोल्हेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग!
कोपरगाव: काम कधीचं थांबत नसते. विकास प्रक्रिया निरंतर सुरूचं असते. शेवटच्या घटकापर्यंत कार्यकर्ता पोहोचतो, असे सांगत, कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोल्हे कुटूंबियांची नाळ जनतेच्या सुख-दुःखाशी जोडली आहे. आम्ही तत्वाशी प्रामाणिक राहुन, संघटन वाढविले आहे.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांची शिकवण व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांचा ध्यास, याचं ताकदीवर पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका लढवून, भारतीय जनता पक्षाचा झेंडा सदैव डौलाने फडकवू, असा ठाम विश्वास भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्या, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला. (Latest Ahilyanagar News)
कोपरगाव शहर व विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे पूर्व -पश्चिम मंडलातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सह सचिव, पॅरंट बॉडी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, अनुसूचित जमाती मोर्चा, अल्पसंख्यांकासह सर्व सेलच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचा नियुक्ती पदग्रहण सत्कार सोहळा पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बिपीनराव कोल्हे होते.
प्रारंभी शामाप्रसाद मुखर्जी, भारत माता व माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय सूचना साहेबराव रोहोम यांनी मांडली. केशव भवर यांनी अनुमोदन दिले. जिल्हा भाजपाचे विक्रम पाचोरे यांनी प्रास्तविक केले. कैलास राहणे यांनी, भाजपच्या माध्यमातून माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. माजी शहराध्यक्ष दत्ता काले म्हणाले की, भाजपामध्ये सामान्य कार्यकर्ता व पंतप्रधान मुख्यमंत्री यांना समान वागणूक मिळते.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे (पूर्वभाग), सुनील कदम (पश्चिम भाग) व शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने काम करू, असे आश्वासन दिले. भाजप राज्य सदस्य रविंद्र बोरावके म्हणाले की, भाजप पक्ष पातळीवर कोपरगावात नवा- जुना वाद राहिला नाही. संवाद झाल्याने तर मने जुळली आहेत.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 11 वर्षात देशात केलेल्या विकासात्मक कार्यामुळे भारत देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीयस्तरावर सुधारली आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तळागाळातील घटकाच्या विकासात्मक कार्यासाठी नवनविन योजनांची आखणी करून, प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले आहेत.
‘लाडकी बहिण योजना,’ राज्यात यशस्वी ठरली, असे सांगत, त्या म्हणाल्या की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी, कोपरगाव मतदार संघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अविरत संघर्ष केला. आता प्रत्येकाने थांबायचे नाय, तर लढायचे, हाय, असे कोल्हे यांनी ठणकावून सांगितले. तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे व सुनील कदम यांनी आभार मानले.
लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नाही!
देशासह राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत, मात्र स्थानिक पातळीवर थेट सत्तेत सहभागी असणार्या लोकप्रतिनिधींनी प्रश्न सोडविण्याचे काम करण्याऐवजी निकृष्ट कामांसह गैरकृत्यांना अप्रत्यक्ष अभय देण्याचे काम सुरू केले आहे. प्रशासनावर त्यांचा वचक नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी नामोल्लेख न करता केली.
कोपरगाव मतदारसंघात सर्वसामान्य घटक मुख्य केंद्रबिंदु आहे. त्याचे प्रलंबित प्रश्न सुटत नसेल, तर सत्तेत असलेल्यांना जाब विचारा. सत्ता लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. ग्रामीण अर्थकारणाला सहकारातून चालना देत, कोपरगावची बाजारपेठ टिकवून ठेवण्यासाठी आजवर आम्ही मोठे काम केले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आमची सतत तळमळ सुरू आहे. पुढील निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. सत्ता असो किंवा नसो, सेवा हाच धर्म मानून आपण कार्यरत असतो, असे सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले.

