

सिद्धटेक: कर्जत तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने इतर पिकांसोबतच ऊस पिकाच्या वाढीवरही मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत उसाला मिळणारा अपुरा भाव, वाढलेले खत व औषधांचे दर,एफआरपीबाबत होणारी कोंडी आणि ऊसतोडीच्या वेळी निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून कांदा व फळबांगांना पसंती दिली होती. परिणामी, उसाच्या लागवड क्षेत्रात काही प्रमाणात घट नोंदवली गेली.
सध्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात साखरेचे दर तेजीत असल्याने यंदा उसाला समाधानकारक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अपुरा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे कर्जत तालुक्यात व भिमा पट्यातील भांबोरा, दुधोडी, जलालपूर , सिद्धटेक, गणेशवाडी, खेडसह इतर गावातील ऊस पिकावर 'पायरिला' (पाकुळी) ही कीड आणि 'तांबेरा' (लाल डाग) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे.
त्याचा उत्पादनावर थेट परिणाम होऊन वजनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पायरिला किडीमुळे पानांतील रस शोषला जाऊन पिकाची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे उसाचे वजन लक्षणीयरीत्या घटते.
तांबेरा रोगामुळे उसाच्या कांड्यांची गुणवत्ता खालावून साखर उतारा कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठीकाणी हुमणी या किडीचा ही धोका वाढला आहे .हा धोका टाळण्यासाठी व पिक वाचवण्यासाठी शेतकरी मोठा खर्च करून अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करून औषध फवारणी करत आहे. त्यामुळे काही प्रमाणात रोगाला प्रतिबंध करता येईल .
ड्रोन उपलब्ध करण्याची मागणी
शेतकऱ्यांवरील संकटाची दखल घेऊन शासनाच्या व कारखान्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन , माफक दरात औषधे व फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ऊतउत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.