

कर्जत: दहा वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीने महसूल प्रशासनाकडेरस्त्याची कशी मागणी केली. त्याच्या अर्जावरून चुकीची स्थळ पाहणी करून अहवाल दिला आहे. तालुक्यातील कोपर्डी येथील जमीन व रस्ता वाद प्रकरणात प्रशासनाकडून योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 23) कर्जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
आंदोलनात पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष नीलेश गायकवाड, कर्जत तालुकाध्यक्ष कमलेश साळवे, सचिन चव्हाण ,किरण चव्हाण सहभागी झाले. यावेळी पत्रकारांना माहिती देताना सचिन चव्हाण व किरण चव्हाण म्हणाले, कोपर्डी येथील रस्त्याबाबत नायब तहसीलदारांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी, पंचनामा व नकाशा तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही.
या प्रकरणांमध्ये सन 2015 या वर्षी मयत झालेले गोरख बापू भवाळ यांनी सन 2025 साली महसूल प्रशासनाकडे रस्ता कसा मागितला. रस्ता मागणी करणाऱ्या अर्जदारांमध्ये तेरा क्रमांकावर मयत व्यक्तीचे नाव आहे. संबंधित अर्जदाराने काही महत्त्वाची माहिती लपवून चुकीची कागदपत्रे सादर केल्याने न्याय प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कोपर्डी येथील गट 214, 215 व 216 या शेतजमिनींना जाणाऱ्या रस्त्याबाबत वाद निर्माण झाला आहे. तसेच यापूर्वी 1999 मध्ये झालेल्या प्रकरणात संबंधितांना मंजुरी देण्यात आली असूनही सध्याच्या प्रकरणात त्या बाबींचा योग्य विचार केला नाही. तहसीलदारांनी स्थळ पाहणी करताना चुकीच्या पद्धतीचे गट नंबर आणि चुकीचे रस्ते नकाशात दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.
अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामधून आता रस्ता जाण्याचा निकाल दिल्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. संबंधितांवर योग्य कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान आंदोलकांची प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र, आंदोलकांचे समाधान न झाल्यामुळे उपोषण सुरूच ठेवलेे.