

Jayakwadi Dam water level update
नगर: नाशिक व अहिल्यानगर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत दमदार पावसाची नोंद झाल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील गोदावरी खोर्यातील 24 लहान मोठ्या धरणांत 103.82 टीएमसी पाणीसाठ्याची आवक झाली. त्यामुळे या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा 86 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 76 टीएमसी इतका झाला.
या दोन्ही जिल्ह्यांतून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा 93 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये 67 टीएमसी इतक्या उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. अद्याप पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे गोदावरीसह प्रवरा, मुळा नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, नगर जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे समाधानाचे तर पावसाअभावी खरीप पिके हातची जाणार असल्यामुळे शेतकर्यांत निराशादायक वातावरण निर्माण झाले आहे.गोदावरी खोर्यात गोदावरी, प्रवरा, मुळा या नद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, मुकणे, करंजवण आदींसह 19 धरणांचा तर नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा व मांडओहळ या पाच धरणांचा गोदावरी खोर्यात समावेश आहे.
या सर्व धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता 87.49 टीएमसी इतकी असून, आजपर्यंत या धरणांत 75.53 ठीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षी हाच पाणीसाठा 47.93 टीएमसी इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 86 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. अद्याप पावसाचा कालावधी दोन महिने शिल्लक आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील धरणे ओव्हर-फ्लो होऊन गोदावरी, मुळा, प्रवरा आदी नद्यांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका बळावला आहे.
जिल्ह्यात एकूण 85 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे या मोठ्या धरणांसह नऊ धरणे आहेत. आजमितीस या धरणांत 85 टक्के म्हणजे 43 हजार 215 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. भंडारदरा धरण 88, निळवंडे 89, तर मुळा धरण 82 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत जिल्ह्यात 58 टक्के म्हणजे 29 हजार 596 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध होता. त्या वेळी मुळा धरण 57 टक्के, निळवंडे 46 तर भंडारदरा 81 टक्के भरलेले होते.
जायकवाडी ओव्हर-फ्लोच्या मार्गावर
गोदावरी नदीवर जायकवाडी सर्वाधिक मोठे धरण आहे. या धरणाची साठवण क्षमता 102.73 टीएमसी आहे. यापैकी 76.66 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 1 जूनपासून या धरणात 49 टीएमसी पाणी पोहोचले आहे. त्यामुळे आतापर्यंत धरणात एकूण 93 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये 67 टीएमसी उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास येत्या आठ दिवसांत जायकवाडी धरण भरण्याची शक्यता बळावली आहे.