

चिचोंडी शिराळ: शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या भगवान फुलमाळी आणि भास्कर आटकर यांना मारहाणीच्या घटनेला 10 दिवस उलटूनही मोकाट असलेल्या मुख्य आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली येथे मंगळवारी तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तनपुरे यांनी या वेळी म्हणाले, की घटनेला 10 दिवस झाले तरी आरोपी राजरोसपणे गावात फिरत आहेत, मग पोलिसांना ते का दिसत नाहीत? आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा संशय आहे. गुन्हा दाखल करतानाही टाळाटाळ करण्यात आली. दोन दिवसांत आरोपींना अटक झाली नाही, तर मी याच रस्त्यावर झोपून आंदोलन करीन.
गावातील मुख्य आरोपी कमरेला कट्टा लावून फिरत असून सर्वसामान्य जनतेला धमकावत असल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला. माजी सभापती संभाजी पालवे यांनीही प्रशासनाचा निषेध करत म्हटले की, सामान्य माणसावर होणारी दडपशाही आणि दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही.
निवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल गायकवाड यांनीही प्रशासनाचा समाचार घेतला. जखमींना हॉस्पिटलमधून सुटी झाल्यावर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर बसावे लागत असेल, तर ही लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी खेद व्यक्त केला.
तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. ‘आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींनादोन दिवसांत अटक करू. त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष अंबादास डमाळे, मिरी-तिसगाव योजनेचे उपाध्यक्ष भीमराव सोनवणे, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, शेतकरी नेते राजेंद्र गिते, राजेंद्र दगडखैर, जालिंदर वामन, राजू क्षेत्रे, संतोष गरुड, राजेंद्र पवार, विजय आव्हाड, संजय आव्हाड, ओंकार आव्हाड, भागीनाथ गवळी, राजू शेख, चंद्रकांत आव्हाड, राजेंद्र आव्हाड, प्रल्हाद आव्हाड, दिनकर आव्हाड, तसेच पीडित भगवान फुलमाळी व भास्कर आटकर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, संदीप ढाकणे, ढगे, यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा उपस्थित होता. मंडल अधिकारी प्रीती शिंदे , तलाठी इम्रान खान इनामदार यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले.