

नगर: शहरातील प्रभाग 17 मध्ये गेल्या एक महिन्यांपासून दूषित पाणी, कमी दाबाने पाणीपुरवठा आणि पाणी सुटण्याची अनिश्चित वेळ यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कृत्रिम पाणीटंचाईच्या निषेधार्थ मंगळवारी नगरसेवकांसह नागरिकांनी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन तीव्र संताप व्यक्त केला.
नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, अश्विनी लोंढे, तसेच कमल कोतकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्त डांगे यांना घेराव घालण्यात आला. निवेदनात म्हटले की, मागील एक महिन्यापासून प्रभाग 17 मधील पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे.
दूषित पाणी, पाणी सुटण्याच्या अनिश्चित वेळा, पाण्याला पुरेसा दाब नसणे अशा सर्व प्रकारच्या समस्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली असता मुळा डॅममधून येणारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून संपूर्ण उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता कमीच आहे.
तरीसुद्धा शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून महापालिका प्रशासन खासगी टँकर व्यावसायिक आणि वॉटर माफियांचे खिसे गरम करण्याचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
येत्या सात दिवसांत प्रभाग 17 मधील विस्कळित झालेला पाणीपुरवठा व्यवस्थित न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभागातील नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. दरम्यान, आयुक्त डांगे यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागाला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.