

दीपक ओहोळ
नगर: जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद आदी आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय नेतृत्त्वाचे धडे घेत जिल्ह्यातील तीन व्यक्तींनी विधान परिषदेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. आता चौथी व्यक्ती म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर जात आहेत.
ग्रामीण व नागरी भागातील पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते व इतर विकासकामांचे प्रश्न शासनदरबारी उपस्थित करता यावे, यासाठी विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निर्माण करण्यात आला. 1967 पासून अहमदनगर मतदारसंघातून आतापर्यंत सहा जणांनी विधान परिषदेत जिल्ह्याचे नेतृत्व केले. आता प्राजक्त तनपुरे नेतृत्व करणार आहेत. या सात सदस्यांपैकी कै. जनार्दन टेकावडे, यशवंतराव गडाख, कै. अरुणकाका जगताप आणि नुकतेच बिनविरोध झालेले प्राजक्त तनपुरे या चौघांनी प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज हाताळलेले आहे. या संस्थांमधील अडचणी, प्रश्न विधिमंडळात मांडून या संस्था अधिक प्रबळ आणि प्रभावी कशा होतील यासाठी या सदस्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.
या मतदारसंघातून 1985 मध्ये विधान परिषदेवर निवडून गेलेले ज.य. टेकावडे यांचा राजकीय श्रीगणेशा श्रीरामपूर नगरपालिकेतून झाला आहे. त्यांनी 25 वर्षे श्रीरामपूरचे नगराध्यक्ष पद भूषविलेले आहे. 1997 मध्ये माजी खासदार यशवंतराव गडाख या मतदारसंघातून निवडून गेले. सलग दोन टर्म ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यांची राजकीय सुरुवात नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपासून झाली.
त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष पद सांभाळले. जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय बाळकडू घेत त्यांनी यापूर्वी दोनदा लोकसभेचे प्रतिनिधीत्व केले. याच मतदारसंघातून 2009 मध्ये कै. अरुणकाका जगताप विधान परिषदेत पोहोचले. त्यांनीही सलग दोन टर्म काम पाहिले. कै. जगताप हे 1992 ते 97 अशी सलग पाच वर्षे अहिल्यानगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते.
प्राजक्त तनपुरे हे 22 जूननंतर विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होत आहेत. तनपुरे यांचा राजकीय प्रवास राहुरी नगरपालिकेतूनच झालेला आहे. सलग पाच वर्षे ते नगराध्यक्ष होते. या नागरी संस्थेच्या माध्यमातूनच राजकीय व प्रशासकीय कामकाजाचे बारकावे आत्मसात करीत ते 2019 मध्ये विधानसभेत पोहोचले होते. आता ते विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. जिल्ह्यातील झेडपी, महापालिका, नगरपालिका-नगरपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विविध प्रश्न आणि अडचणी शासनदरबारी मांडून त्या सोडवतील अशी अपेक्षा तनपुरे यांच्याकडून केली जात आहे.
तीन नेते थेट विधिमंडळात
१९६७ साली पहिल्यांदा या मतदारसंघातून पां.य. फलके गुरुजी निवडून गेले. १९७२ मध्ये कै. मारुतराव घुले तर १९७८ मध्ये आबासाहेब निंबाळकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. विधान परिषदेवर निवडून जाण्यापूर्वीच घुले पाटील आणि निंबाळकर यांनी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीत्व न करता हे तीनही नेते थेट विधिमंडळात पोहोचले होते.