

नगर: अहिल्यानगर जिल्हा प्रचंड गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. वारंवार गुन्हे करून भाईगिरी करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कंबर कसली असून, आज रेकॉर्डवरील २२० गुन्हेगारांचा मेळावा घेऊन त्यांचे समुपदेशन केले. भाईगिरी कराल तर थेट जेलमध्ये जाल असा कडक इशारा पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी दिला.
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दक्षिण जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील २२० गुन्हेगारांचा पोलिस मुख्यालयात मेळावा घेऊन समपुदेशन केले. त्यांच्याकडून इंट्रॉगेशन फॉर्म भरुन घेऊन प्रतिबंधक कारवाईचे बंधपत्राची माहिती घेण्यात आली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहराचे उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, उपअधीक्षक शिरीष वमने उपस्थित होते.
गुन्हेगारांचे समपुदेशन करताना पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन ठेवा. गुन्हेगारी सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहत सहभागी व्हावा. भाईगिरी, गँगवार, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, शस्त्राचा बेकायदेशीर वापर तसेच कोणत्याही प्रकारचा कयदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना घडल्यास संबंधिताविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारची प्रक्रिया तसेच इतर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम रहावी, या उद्देशाने आरोपींना कायद्याचे पालन करावे, अशा स्पष्ट सूचना केल्या.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गुन्हेगाराविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून, अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात सातत्याने कारवाई सुरु आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून हे विशेष समुपदेशन आयोजित केले. या उपक्रमामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर पोलिस दलाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संदेश देण्यात आले आहे.
तुमचं सगळ रेकॉर्ड आमच्याकडे आहे. त्यामुळे पुन्हा गुन्हा करण्याचा प्रयत्न करू नका. भाईगिरी, दादागिरी सोडून द्या. अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक