

नगर: अहिल्यानगर जिल्हा बँकेची वाटचाल ऐतिहासिक आहे. बँकेच्या मुख्यालयाचे आधुनिक स्वरूप पाहून ती सहकारी बँक नव्हे, तर एक कार्पोरेट ऑफिस वाटते. हेच या बँकेच्या प्रगतीचे द्योतक आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी सहकाराची पायाभरणी केली. सामान्य माणसांच्या जीवनात आर्थिक क्रांती करण्याचे कार्य नगर जिल्ह्याने सिद्ध केले आहे. आता काळानुरूप स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर आवश्यक आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या मुख्यालयाचे नूतनीकरण व ई-लॉबीचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, चेअरमन चंद्रशेखर घुले, व्हॉ. चेअरमन माधवराव कानवडे,
संचालक भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात, करण ससाणे, गीतांजली शेळके, सीताराम गायकर, प्रशांत गायकवाड, अरुण तनपुरे, गणपतराव सांगळे, आमदार नरेंद्र घुले, राजेंद्र नागवडे, क्षीतिज घुले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.
मंत्री बाबाबसाहेब पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार खात्याची निर्मिती झाली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने देशभरातील सहकारी मंत्र्यांच्या बैठकांमुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळत आहे.
कार्यक्रमादरम्यान दोन्ही मंत्र्यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यशैलीचे स्मरण करीत त्यांना आदरांजली वाहिली. बँकेच्या नूतनीकरणाची संकल्पना पालकमंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेच्या काळात आकारास आली, तिला स्वर्गीय उदय शेळके यांनी गती दिली, आणि स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या काळात ही इमारत पूर्णत्वाला पोहोचली. आज उद्घाटनाच्या वेळी त्यांच्या अनुपस्थितीची खंत सर्वांनी व्यक्त केली. प्रास्ताविक चेअरमन चंद्रशेखर पाटील घुले यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.