

नगर : चास (ता. अहिल्यानगर) येथेल सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक, चास येथे विविध तांत्रिक कौशल्य व ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय टेक्नोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या टेक्नोत्सवामध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व बौद्धिक गुणवत्तेला वाव मिळावा त्यासाठी विविध स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. टेक्नोत्सवाचे उद्घाटन साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या सचिव लीना आडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा. सीमा आगरकर, साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध आडसूळ, सी.ई.ओ. बापुराजे अर्लकस, मोहिनी अर्लकस व पॉलिटेक्निकचे प्राचार्य आर. एस. गडाख, प्राचार्य संभाजी पठारे आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संभाजी पठारे म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील कल्पकता, संशोधन वृत्ती व तंत्रज्ञानातील कार्यप्रणाली ही समाज उपयोगी असावी. प्रचंड कष्ट, जिद्द, चिकाटी, सचोटी या आधारावरच नवीन आविष्कार हे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असतात तेव्हा विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी व्हावे.
प्राचार्य आर. एस. गडाख म्हणाले की, राज्यभरातून विविध भागातून टेक्नोत्सवच्या निमित्ताने विद्यार्थी एकत्र येतात. या व्यासपीठाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण, नवनव्या संकल्पना, सादरीकरण कौशल्य, संवाद कौशल्य, स्पर्धेतील चुरस, तज्ञांचे मार्गदर्शन, नवनिर्मितीचा आनंद अशा विविध गुणांनी नटलेल्या व नवउन्मेशाची अनुभूती या टेक्नोत्सव सारख्या व्यासपीठातून राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळत असते.
प्रा. सीमा आगरकर म्हणाल्या की, आडसूळ पॉलिटेक्निक ने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सातत्याने तेरा वर्ष राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना कल्पकतेला वाव देणारा आहे.
टेक्नोत्सवांतर्गत प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजूषा, तसेच पोस्टर प्रेझेंटेशन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले तांत्रिक ज्ञान, सादरीकरण कौशल्य, संवाद कौशल्य संशोधन दृष्टिकोन तसेच सर्जनशीलता प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. एस. पवळे, एम. बी. जाधव, पी. पी. होले, एस. सी. पाळंदे यांनी परिश्रम घेतले.
आडसूळ कॅम्पसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध आडसूळ म्हणाले की, आडसूळ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात चांगले पेटंट तयार करण्याची कामगिरी केली तर, पेटंट नोंदणीचा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येतील. त्या पेटंटची नोंद ही त्याच विद्यार्थ्यांच्या नावावर होईल असे आश्वासन देत विद्यार्थ्यांना नामी संधी असल्याचे सांगितले.