

श्रीगोंदा : श्रीगोंदा ते बीड या राष्ट्रीय महामार्गावर भावडी ते रुईगव्हाण फाटा या दरम्यानच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. स्थानिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यात कुठलीच सुधारणा न झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि. 19) दुपारी चारच्या सुमारास तासभर अचानक राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.
श्रीगोंदा ते बीड या राष्ट्रीय महामार्गाचे शुक्लकाष्ट संपायला तयार नसून, ठिकठिकाणी धीम्या गतीने सुरू आहे. आढळगाव परिसरात अपूर्ण कामाचा नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर अन् खा.निलेश लंके यांनी त्यांच्या खास शैलीत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्यानंतर या भागातील काम जवळपास पूर्ण झाले. भावडी ते रुईगव्हाण फाटा या दरम्यानच्या दोन किलोमीटर रस्त्याची पूर्ण वाट लागली आहे. हे दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी जवळपास वीस मिनिटे लागतात. त्याच दरम्यान सीना कालव्यावरील पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. पुलाच्या कामासाठी चार महिन्यापूर्वी खोदकाम करण्यात आले.
वाहनासाठी जुजबी बाह्यवळण रस्ता केला मात्र या रस्त्यावर मुरुम न टाकल्यामुळे अवजड वाहने या ठिकाणाहून जाताना अडकून पडतात. आजूबाजूच्या नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा सांगूनही कामात सुधारणा न झाल्याने संतप्त नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास अचानक रस्ता रोखून धरला. अचानक रस्ता बंद झाल्याने पुणे, बीड,लातूर भागातून आलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली.
जवळपास एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोखला गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. मात्र अद्यापही कामात फारशी प्रगती झाली नाही.