

gardian minister Vikhe Patil on shirdi sansthan
शिर्डी: श्री साईबाबा संस्थानचे व्यवस्थापन नियंत्रण व कार्यान्वयासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधी व न्याय विभागाचे तसे पत्र संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना प्राप्त झाले आहे. 50 लाख आर्थिक मर्यादेत समितीला निर्णय घेता येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असलेल्या समितीत जिल्हाधिकारी सहअध्यक्ष तर संगमनेरचे आ.अमोल खताळ, कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांच्यासह शिर्डीचे नगराध्यक्ष सदस्य असलेल्या समितीचे सचिव म्हणून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सचिव असणार आहेत. (Latest Ahilyanagar News)
विधि व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सु.प. साळुंके यांनी गुरूवारी साईबाबा संस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे समितीची माहिती कळविली आहे. श्री साईबाबा संस्थानचा दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालणे तसेच साईभक्त व रुग्णांना उच्च दर्जाचे सेवासुविधा पुरविण्यासाठी व्यवस्थापकीय निर्णय जलद गतीने व्हावे याकरीता शासनामार्फत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम 2004 मधील कलम 34 मधील तरतुदींनुसार संस्थानच्या व्यवस्थापन समितीची नियुक्ती होईपर्यंत शासनाच्या अखत्यारित 6 महिन्यांकरीता रुपये 50 लाख रुपये आर्थिक मर्यादेपर्यंतचे निर्णय घेण्याकरीता पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यासाठी विनंती केली आहे.
प्रस्तावाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे प्रशासकीय समिती स्थापन करणेबाबत मान्यता देण्याची विनंती संस्थानस्तरावरुन करण्याचे पत्रात सूचित करण्यात आले आहे. खंडपीठाकडून होणार्या निर्णयाबाबत शासनास अवगत करण्यात यावे असे पत्रात म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतरच कार्यान्वित!
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ नियुक्त झालेले नाही. त्यामुळे संस्थानचा कारभार प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीमार्फत सुरू आहे. आता या समितीशिवाय आणखी एक प्रशासकीय समिती स्थापन केली जाणार आहे. त्यात राजकीय आणि प्रशासकीय अधिकार्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र ही समिती स्थापन करण्याला छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी घेण्याची जबाबदारी संस्थानकडे सोपविण्यात आली आहे.
साईभक्तांसाठी 5 लाखांचे विमा कवच
पालखी तसेच खासगी आणि सार्वजनिक वाहनाने शिर्डीत दर्शनासाठी येणार्या भाविकांना 5 लाख रुपयांचे विमा कवच दिले जाणार आहे. तसा निर्णय संस्थानने घेतला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
संस्थानमार्फत पुरविल्या जाणार्या ऑनलाईन भक्तनिवास रूम बुकिंग, व्हिआयपी आरती किंवा दर्शन पास, सत्यनारायण पूजा, अभिषेक पास यासाठी नोंदणी असणार्यांनाच विमा कवच मिळणार आहे. दुर्देवाने येताना दुघटर्न घडली तर भक्तांच्या वारसांना विमा पॉलिसीतून 5 लाख रुपयांची अपघाती रक्कम मिळणार आहे. विमा कवच देताना वयाची अट मात्र शिथील करण्यात आली आहे.