नाशिक : पुढारी वृत्तसेवा; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात शनिवारी (दि.३०) अयोध्येतून आलेल्या अक्षता कलश पूजनास परवानगी दिल्याने वाद उद्भवला होता. या कार्यक्रमाची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिली परंतू या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीसह काही संघटनांनी आक्षेप घेत विरोध केला. कुलगुरू प्रा. सोनवणे विद्यापीठात उपस्थित असून पूजनास न आल्याने त्यावरून टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर अनेकांनी कार्यक्रमाचे परिपत्रक सोशल मिडियावर प्रसिध्द करून पाटील यांच्यासह मुक्त विद्यापीठाला ट्रोल केले होते.
स्वत:हून केली बदलीची मागणी
(दि.१९) डिसेंबर रोजी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी बदलीची मागणी केली होती. त्यांची शस्त्रक्रिया असल्याने घटनेच्या आदल्या दिवशी शुक्रवारी ते गावला गेले होते. पाटील यांच्या बदलीच्या मागणीचे पत्र असल्याने घटनेचा आणि बदलीचा कोणताही संबंध नसल्याचे मुक्त विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान १० ते १२ जानेवारी रोजी विद्यापीठात राष्ट्रीय परिषद आयोजित आहे तर, येत्या काही दिवसात विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होत असून कुलसचिव पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती पाटील यांनी पत्राद्वारे केली होती. पुढील काही दिवस ते ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हते. त्याबाबत सोमवारी (१) जानेवारी रोजी त्यांनी स्वत:हून जबाबदारी नाकारली आणि १५ दिवस रजेवर असल्याने इतर जबाबदारी स्विकारू शकत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे प्रभारी कुलसचिव पदाची जबाबदारी विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा