नाशिक शहरात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत मनाई आदेश, 'हे' आहे कारण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २६ डिसेंबर ते ९ जानेवारी या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहरात मनाई आदेश लागू केला आहे.
राज्यातील विविध राजकीय पक्षांमधील फुट व त्यामुळे होणारे आरोप- प्रत्यारोप, त्याचप्रमाणे, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रकरणे, वादग्रस्त विधाने, विविध मागण्यांसाठी होणारी निदर्शने यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणासंदर्भात आंदोलने सुरू आहेत. तर, मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागतासाठी नागरिकांकडून जल्लोष केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राहावी, व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कर्णिक यांनी २६ डिसेंबरपासून ९ जानेवारीपर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत.
त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या,बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे पद्रर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभक भाषण, वर्तवणूकीस बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पुर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील असा इशाराही आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे.
हेही वाचा :