उगांव ता, निफाड: पुढारी वृत्तसेवा; हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
हवामानात बदल झाला असल्याने राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीसे ढगाळ वातावरण आहे. त्यात आता जिल्ह्यात द्राक्ष बागांच्या कामांची लगबग सुरु आहे. घडथिनिंग, डिपिंग, फेलफुट या कामांची रेलचेल आहे. मात्र आज शुक्रवार सकाळपासून ढगाळ हवामान तयार झाल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. या ढगाळ हवामानामुळे डावणी, भुरी हे बुरशीजन्य रोग डोके वर काढु लागले आहेत. तसेच फुलोरा अवस्थेत द्राक्षनगरीत पाऊस झाला तर घडकुज अन् मणीगळ होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे द्राक्षबागेत सकाळपासून रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करुन संभाव्य धोक्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न द्राक्ष बागायतदार करत आहेत.
द्राक्षबागांवर बुरशीजन्य रोगांचा होणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रोगप्रतिकारक औषधांचा पर्याय आहे. मात्र तो खर्चात वाढ करणारा आहे. शिवाय फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांवर पाऊस पडल्यास घडकुज व मणीगळ होण्याचे संकट कोणत्याही उपायाने दुर करता येत नाही. त्याकरिता प्लास्टिक आच्छादन हाच एकमेव पर्याय आहे. –
अँड रवींद्र निमसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे,विभाग नाशिक
हेही वाचा :