Nashik News : गंगापूर धरणातील पाण्याचा बदलतोय रंग ; पाणी प्रदूषित?  | पुढारी

Nashik News : गंगापूर धरणातील पाण्याचा बदलतोय रंग ; पाणी प्रदूषित? 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून महापालिकेच्या भूमिगत गटारी, नैसर्गिक नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात असून, हे सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्यामुळे नदीपात्र प्रदूषित झाल्याचे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. आता तर गंगापूर धरणातील पाणीही प्रदूषित बनल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी नाशिककरांनी एकत्र येण्याचे आवाहन आपलं पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी केले आहे.

संबधित बातम्या :

गंगापूर रोडवरील सोमेश्वर धबधब्याजवळ गोदापात्रात विशिष्ट प्रकारचा तवंग असल्याचे तसेच पाण्याला हिरवट रंग असल्याचे अनेकवेळा आढळून आले आहे. नदीपात्रातील मासेही मृत झाल्याचा प्रकारही बऱ्याचा वेळा घडला आहे. या प्रकरणात महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर कागदोपत्री कारवाई पलीकडे कुठलीही कृती केली जात नाही. औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून त्यांचे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट महापालिकेच्या भूमिगत गटारी, नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जाते. या गटारीतील पाणी नैसर्गिक नाले गोदापात्रात मिसळल्यानंतर सांडपाण्यामुळे गोदापात्र प्रदूषित होते. त्यामुळे जलचरांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता गंगापूर धरणातील पाण्यातही प्रदूषण होत असल्याचे दिसून आले आहे. आपलं पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी व वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी या जलप्रदूषणाचा मागोवा घेतला. त्यांनी गंगापूर धरण ते गोदावरी नदीपात्रातील पाण्याची पंधरा दिवस पाहणी केली. धरणातील पाणी काही भागात निर्मळ, तर बोट क्लबच्या बाजूला हिरवट व पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तवंग आल्याचे दिसून येत असल्याची नोंद त्यांनी घेतली. मानवी तसेच जलचरांसाठी हे प्रदूषित पाणी धोकेदायक असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे.

गंगापूर धरणही प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. धरणातील पाण्याचा रंग बदलत आहे. पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग काही बाजूने दिसत आहे. पाणी असा रंग का बदलत आहे, याची कारणे शोधून वेळीच अमृत कुंभाप्रति जागरूक झाले पाहिजे. जलपूजनाबरोबरच धरणाच्या जलशुद्धीकरणावर लक्ष देणे गरजेचे आहे.

– शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था

हेही वाचा :

Back to top button