नाशिक : पुढारी वृत्तसेवा, जिल्ह्यात पावसाच्या विश्रांतीनंतर उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यासोबत ग्रामीण भागाला टंचाईच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे. आॅॅक्टोबरच्या प्रारंभीच निम्मा जिल्ह्यातील तब्बल २३९ गावे-वाड्यांना ९० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. (Nashik News)
संबधित बातम्या :
चालूवर्षी अल निनोच्या प्रभावामुळे जून ते आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला. गेल्या महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग करताना जिल्हावासीयांना काहीसा दिलासा दिला. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. पण, बहुतांश गावोगावी पाण्याचे नैसर्गिक स्रोत अद्यापही कोरडेठाक पडले आहेत. त्यातच आता आॅक्टोबर हीटमुळे तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी ग्रामीण जनतेला आताच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. (Nashik News)
जिल्ह्यातील सात तालुक्यांत एेन पावसाळ्यातही टँकरचा फेरा कायम होता. पावसाचा जोर कमी हाेताच टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. त्यानुसार सात तालुक्यांतील ९८ गावे आणि १४१ वाड्या अशा एकूण २३९ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने टँकरच्या २१२ फेऱ्या मंजूर केल्या असून, दिवसागणिक मंंजूर फेऱ्या पूर्ण होत आहेत.
येवल्यात सर्वाधिक २२ टँकर धावत आहेत. त्या खालोखाल चांदवडला २१ टँकर सुरू असून, नांदगाव, मालेगावमध्येही टंचाईच्या झळा अधिक बसत आहेत. दुसरीकडे प्रशासनाने गावांसाठी तसेच टँकर भरण्यासाठी एकूण ४१ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर हीटमुळे सामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. येत्या काळात उन्हाचा तडाखा अधिक वाढू शकताे. अशा परिस्थितीत टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
टँकरची परिस्थिती
तालुका- गावे- टँकर
येवला-49 -22
चांदवड -59- 21
नांदगाव- 74- 18
मालेगाव- 33- 15
देवळा -08- 05
बागलाण -07- 03
सिन्नर -09-06
एकूण -239 -90
हेही वाचा :