नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत. मुख्यमंत्रिपद गेल्याच्या रागातून ते टीका करत असल्याने त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. आम्ही प्रत्युत्तर दिले तर त्यांना अपमानास्पद वाटते. त्यामुळे त्यांनी आता टीका करणे थांबवले पाहिजे, असा सल्ला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या ना. केसरकर यांनी विविध मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायी इर्शाळवाडी डोंगर चढून गेले होते. मुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत काम करतात. अहाेरात्र काम करताना त्यांना सलाइन लावावे लागते. कारण माणसाला किमान झाेप हवी असते. ते प्रत्येकवेळी टीकेला उत्तर देणार नाही. एक कट्टर शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्याची गरज असल्याचे मत ना. केसरकर यांनी व्यक्त केले.
संभाजी भिडे यांना गड-किल्ल्यांसंदर्भात ओळखतो. त्यांनी राजकीय प्रश्नांवर भाष्य करणे चुकीचे आहे. वाढत्या वयामुळे भिडेंकडून वादग्रस्त विधाने होत असतील. गृहमंत्र्यांनी भिडेंचे वक्तव्य तपासण्याचे आश्वासन दिले आहे. भिडेंच्या अशा वक्तव्यामुळे देशाला दुःख होते. त्यांनी इतर विषयांवर भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचे ना. केसरकर यांनी सांगितले.
शंभर कौरव एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे हित लक्षात घेऊन कारभार करत आहेत. मात्र, एकट्या पंतप्रधानाविरोधात शंभर कौरव एकत्र येत आहेत. जे देशाच्या हिताचा विचार करत नाही, त्यांना कौरवच म्हणावे लागेल असे सांगत ना. केसरकर यांनी संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणाचे, हे तपासण्याची गरज असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
हेही वाचा :