कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज | पुढारी

कृषी महोत्सव : नागरिकांसह शेतकर्‍यांसाठीही दोनशे स्टॉल सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शासनाच्या आत्मा विभागातर्फे नाशिकमध्ये मंगळवार (दि. 6)पासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर पाच दिवस भरणार्‍या महोत्सवात नाशिककरांना शेतकर्‍यांकडून थेट शेतमाल खरेदी करता येईल. तसेच सेंद्रिय शेतीमाल, आधुनिक शेती अवजारांच्या प्रदर्शनासह खाद्य महोत्सवासह शेतीशी निगडित परिसंवादाचे आयोजन केले आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या डोममध्ये साधारणपणे 200 स्टॉल उभारण्यात आले आहेत. याबाबत काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती आत्माचे राजेंद्र निकम यांनी दिली. डोममध्ये उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकरी, शेतकरी उत्पादक गट व बचत गटांसह शासनाच्या कृषीशी निगडित विविध विभागांचे स्टॉल असतील. दुसर्‍या भागात कृषीनिविष्ठा कंपन्या, शेती अवजारांचे कंपन्या आदींना स्टॉलसाठी जागा देण्यात आली आहे. आत्माच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पाच दिवस फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग, महिला परिसंवाद, बाजाराभिमुख कृषक उत्पादने व विपणन, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य अनुषंगाने विविध परिसंवाद तसेच खरेदीदार-विक्रेता संमलेनाचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button