मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांचा रस्ते प्रवास वेगवान करणाऱ्या राष्ट्रीय महामागाँवरील अपघातप्रवण क्षेत्रांमुळे अपघातांत वाढ होत आहे. सातारा- पुणे (४८), खेड-सिन्नर (६०) आणि पुणे- सोलापूर (६५) या तीन राष्ट्रीय महामार्गावर गेल्या सात महिन्यांत ६०६ अपघात झाले आहेत. यात प्राणांतिक अपघातांची संख्या ७४ आहे.
गेल्या वर्षी याच तीन महामागाँवर तब्बल १ हजार ७७ अपघात झाले होते. त्यात १२९ जणांनी जीव गमावला होता राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी सहा लाख किलोमीटरहून अधिक आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बांधलेल्या १७ हजार ७५७ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा यात समावेश आहे.
राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, ग्रामीण रस्ते आणि शहरांच्या रस्त्यांच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग सर्वांत कमी आहेत. मात्र, ब्लॅक स्पॉटमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा समावेश जास्त आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षात घेतले तर, सुमारे ४५ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर होतात.
वाढत्या रस्ते अपघातांमुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाढत्या अपघातांचे सखोल विश्लेषण करण्याची नवीन योजना आखली आहे. या योजनेत अपघाताचे ठिकाण, कारण, वेळ, वाहनाचा प्रकार, रस्त्याची अवस्था, हवामानाची परिस्थिती, वाहनचालक, प्रवाशांची माहिती यासह एकूण १७ विषयांची माहिती अत्यंत बारकाईने नोंदवली जात आहे. अपघात रोखण्यासाठी महामार्गावरील अतिक्रमण काढून रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासह वेग नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
पुणे-सोलापूर हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील सर्वांत मोठा महामार्ग आहे. हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यातून हा महामार्ग जातो. या रस्त्यावर बाळू वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. तसेच, दक्षिण भारताला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने मालवाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे,
त्यामुळे तुलनेने या मार्गावर जड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. त्यातच महामार्गालगतची गावे विकसित झाल्याने स्थानिक वाहतुकीचे प्रमाणही अधिक आहे. गेल्या वर्षी या महामार्गावर ६९८ अपघात झाले होते. यंदा ३५६ अपघात झाले आहेत.