सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न?
लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर दक्षिण भारतातील कांद्याचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार असे सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शनिवारी लासलगाव येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान ६००, कमाल २४२१ तर सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी कांद्यावर बफर स्टोकचे शहरी भागात वितरणास परवानगी, ४० टक्के निर्यात शुल्क आकारण्याच्या निर्णय घेतला आणि त्याचे स्थानिक पातळीवर संतप्त पडसाद उमटत आहेत. त्याचा थेट परिणाम दरावर होईल. सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी बंद पाळत सरकारचा निषेध केला.
यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा साठवण केल्यानंतर कांदा सडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बळीराजा आता हळूहळू चांगला कांदा गरजेनुसार विक्रीसाठी बाजार समितीत नेत आहेत. मात्र कांद्याच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्याला सध्या दर मिळत आहेत. एकीकडे भावात जरी सुधारणा दिसत असली मात्र बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या प्रतवारी मध्ये कमालीची घट झाल्याने मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसत आहे. या हंगामात दक्षिण भारतातील कांद्याचे हे पावसाने मोठे नुकसान झाल्याने संभाव्य कांदा टंचाई लक्षात घेता केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :