नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर | पुढारी

नाशिकमध्ये बेशिस्त रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरासह उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत असते. विशेषत: चौकाचौकांत आणि वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांनी रविवार कारंजा परिसरात कारवाईचा बडगा उगारला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार कारंजा ते मेनरोड रस्त्यावर समर्थ ज्यूस सेंटरसमोर संशयित अजिंक्य भारत चाहाळे (२२, रा. कालिकानगर, दिंडोरी रोड) हा स्वत:च्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५, एफयु ०३४७) उभी करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती करताना आढळून आला. तर या परिसरातील एग्ज एजन्सीसमोर सार्वजनिक रस्त्यात संशयित तुषार गोपाल जाधव (२०, रा. तारवालानगर, दिंडोरी रोड) हा स्वत:च्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५, एफयू ९४४) उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करताना आढळला.

रविवार कारंजा परिसरातील व्यवहारे साेडा वॉटर सेंटरसमोर संशयित ताराचंद ऊर्फ पप्पू बिरू शिंदे (२६, आरटीओ कार्यालयासमोर, दिंडोरी रोड) यानेही स्वत:च्या ताब्यातील रिक्षा (एमएच १५, एफयू ७०६४) ही सार्वजनिक रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी कृती करतानाही आढळला. दरम्यान, तिघा संशयित रिक्षाचालकांविरोधात सरकारवाडा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांची प्रवाशांना मारहाण

रिक्षा भाडे ठरविण्याच्या कारणावरून वाद घालत मुंबईच्या दोघा प्रवाशांना रिक्षाचालकांनी मारहाण केल्याची घटना द्वारका परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानाजी गंगाधर मेहेंदळे (४४, रा. कांदीवली, मुंबई) व प्रकाश नामदेव आहिरे (४१, रा. नायगाव इस्ट, ता. वसई) यांना भाडे ठरविण्याच्या वादातून अज्ञात रिक्षाचालकांनी शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button