नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यात स्थिरावलेला १४६ उंटांना त्यांच्या मुळ अधिवास असलेल्या राजस्थानमध्ये नेण्यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यामुळे ऊंटांच्या सिरोहीकडील (राजस्थान) प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान उंटांना नेणारे रायका नाशिकला पोहचले नसून ते बुधवारी (दि.१७) येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून उंटांचा मुद्दा गाजतो आहे. राजस्थान-गुजरातमार्गे १५४ उंट नाशिक व मालेगाव येथे दाखल झाले होते. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच जिल्ह्यात दाखल झालेल्या या उंटांबाबत यंत्रणांकडे काेणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे उंटांचा प्रश्न जटील बनला. या सर्व प्रकारात तब्बल ९ उंटांना गीव गमावावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात दाखल झालेल्या या उंटांचे राजस्थानमधील सिंरोहि येथील महावीर कॅमल सेन्चुरीत पुर्नवसन करण्यात येणार आहे. श्रीमद राजचंद्र मिशनने उंटांना राजस्थानपर्यंत पोहचविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच राजस्थान येथून उंटांना घेऊन जाण्यासाठी १० ते १२ रायकाही (उंटपालक) या संस्थेने बोलवले आहे. बुधवारी (दि.१६) सायंकाळी हे रायका नाशिकमध्ये दाखल होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहेत. त्यामुळे गुरूवारपासून (दि.१८) उंटांचा घरवापसीचा प्रवास सुरू होण्याची आशा आहे.
उंटांना राजस्थानकडे परत पाठविण्यासाठी प्रशासनने सर्व प्रकारची पुर्तता केली आहे. जिल्हाधिकार्यांचे उंटांच्या स्थलांतराबाबतचे पत्रही प्राप्त झाले आहे. नाशिकचे वातावरण या उंटांना मानवत नसल्याने लवकरात लवकर या उंटांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल. याकरीता राजस्थानहून रायकांना पाचारण करण्यात आले असून बुधवारी सायंकाळपर्यंत ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
-नरेशकुमार बहिरम, तहसीलदार, नाशिक
हेही वाचा :