नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह | पुढारी

नाशिक : रमजानच्या तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा

रमजान हा इस्लामी कालगणनेचा नववा महिना आहे. जगभरातील मुस्लीम उपवासाचा महिना म्हणून पाळतात. रमजानमध्ये तीन आशरे असून, शेवटचा आशरा सुरू झाल्याने ईश्वराची दुवा मागण्यासाठी विशेष प्रार्थनेला अतिशय महत्त्व आहे. तृतीय आशरामुळे मुस्लीम समाजात उत्साह आहे.

रमजानचे उपवास पाळणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानले जाते. चंद्राच्या एका चंद्रकोर दिसण्यापासून दुसरी चंद्रकोर दिसेपर्यंत  29 ते 30 दिवसांचा हा महिना असताे. अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टीकडे कानाडोळा करून दुनियेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठवणे, मनात नीतीमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजवणे, कानांना फक्त चांगले उदात्त विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवण आहे. तसेच मनामनांतील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढवणारा हा महिना संयम, त्याग शांती, सहिष्णुता, चांगुलपणा प्रामाणिकपणा माणसाचे ठायी रुजविणारा हा महिना माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना आहे. या महिन्याचे माहात्म्य पवित्र्य सांगावे तेवढे थोडेच. 

रमजान हा ईश्वर (अल्लाह)चा महिना मानला जातो. या महिन्यात ईश्वराचे एक नाव रहमान (दयाळू) तो आपल्या समस्त मानवजातीवर या महिन्यात कृपादृष्टी करतो व त्यांच्या चुकांना माफ करतो.  रमजानचे १० /१० दिवसांची तीन भाग केले जातात. ज्याला आशरा असे म्हणतात. रमजानमध्ये तीन आशरे आहेत. शेवटचा आशरा विशेष मानला जातो. तो 21 रमजानपासून सुरू होतो. या शेवटच्या आशऱ्यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक रात्र शबे कद्र असते. काही मोमीन शेवटच्या १० दिवस मशिदीमध्ये एते-काफमध्ये बसतात. जर कोणी मशिदीत एते-काफला बसला असेल तर त्याला दहा दिवस मशिदीबाहेर पडता येत नाही. एतेकाफमध्ये लोकांची कल्याण, प्रगती आणि बरे होण्यासाठी याचक ईश्वराकडे प्रार्थना करतात. तसेच आपल्याजवळील कष्टाने कमावलेल्या संपत्तीमधून काही रक्कम गोरगरिबांमध्ये दान करून जकात अदा करतात.

हेही वाचा:

Back to top button