नाशिक : केवळ पिकाची नव्हे तर पैशाची शेती करा - नितिन गडकरी
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण एक भाग आहोत. या दृष्टीने शेतीकडे पहा. मागणी आणि पुरवठा याचे गणित लक्षात घ्या. केवळ पिकाची नव्हे तर पैशाची शेती करा. संशोधनावर भर द्या. त्याला उद्योजकतेची जोड द्या. ‘सह्याद्री’ हे काम करीत आहे. प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संस्था झाल्या तर देश जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. असा विश्वास केंद्रीय रस्ते, महामार्ग व परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी केले. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या मोहाडी (ता. दिंडोरी) येथील प्रांगणात शनिवारी (दि.18) बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या फलोत्पादक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्य विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे उपस्थित होते. यावेळी द्राक्षशेतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. गडकरी म्हणाले, शेतकरी एकत्र आले तर कसा चमत्कार होऊ शकतो याचे सह्याद्री हे एक आदर्श उदाहरण आहे. स्वत:च्या हिंमतीवर शेतकरी निर्यात करत आहेत. मालाला चांगला भाव मिळवत आहेत. हे स्वप्न तुम्ही कृतीत उतरवून दाखवले आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात जर अशी ‘सह्याद्री’ निर्माण झाली तर आपला देश जगात पहिल्या क्रमांकावर नक्कीच पोहोचेल. आपण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत आणि तुमच्या उत्पादनाचा संबंध मागणी आणि पुरवठ्याशी आहे हे समजून घ्या. मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल तेव्हाच दर वाढतील हे साधे सूत्र आहे. या वैश्विक अर्थव्यवस्थेत कशात क्षमता आहे हे लक्षात घ्या. स्वत: तुमचे संशोधनाचे काम करा. त्यात नफ्याची शक्यता जास्त आहे. कलमे विकून जास्त पैसा कमावता येतो. हायब्रीड करणे, टिस्यू कल्चर हे तंत्रज्ञान उपयुक्त आणि लाभदायीही आहे. फळांचे रस, ज्यूस आणि इतर मूल्यवर्धन करणे हे तंत्रज्ञान आहे. ‘सह्याद्री’ यातही काम करीत आहे हे कौतुकास्पद आहे.
झिरवाळ म्हणाले, जिद्दीने शेती करणारे तरुण शेतकरी ही या भागाची ओळख आहे. अवकाळीने शेती जशी अडचणीत आली आहे. तशी शेतमजूरही अडचणीत आले आहेत. त्यांच्या निवाऱ्याबाबत व्यवस्था करावी.
विलास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, -राज्यात ऊसशेती आणि दुग्ध व्यवसाय यात इको सिस्टीम तयार झाली व त्यातून ग्रामीण भागात क्रांती झाली. तशी क्रांती इतरही फळपिकांमध्ये होण्याची गरज आहे. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची मोठी क्षमता या पिकांमध्ये आहे. त्यासाठी योजनाबद्ध व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमप्रसंगी एच-स्क्वेअर इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. सह्याद्री फार्म्स सस्टेनेबल ग्रासरुट इनिशिएटीव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबासाहेब काळे यांनी आभार मानले.
ज्येष्ठ द्राक्ष मान्यवर उत्पादकांचा कृतज्ञ सन्मान
राज्यभरात द्राक्षशेती रुजविण्यात तसेच द्राक्ष उद्योग उभा राहण्यात अनेक जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्यातील काही ज्येष्ठ प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा यावेळी केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्याहस्ते कृतज्ञ सन्मान हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
सन्मानार्थी मान्यवर द्राक्ष उत्पादक असे : श्रीराम ढोकरे, डी.बी.मोगल, जगन्नाथ खापरे, अशोक गायकवाड, माणिकराव पाटील, वासुदेव काठे, राजेंद्र ब्रम्हेचा, अरुण मोरे.
30 हजार यूनिट वीज निर्मिती
सह्याद्री फार्म्समधून दररोज 150 टनाचे ॲग्री वेस्ट होते. त्यापासून दररोज 15 हजार मीटर क्यूब गॅस निर्मिती होईल. या गॅसपासून प्रतिदिन 30 हजार युनिट वीज निर्मिती होणार आहे. सह्याद्रीच्या एकूण गरजेच्या 30 टक्के वीज अशा प्रकारे कचऱ्यापासून व सौर उजेतून तयार होते.