नाशिक : त्र्यंबकला आश्रमशा‌ळेतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू | पुढारी

नाशिक : त्र्यंबकला आश्रमशा‌ळेतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर येथील आदिवासी सेवा समितीच्या प्राथमिक शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, मंगळवारी त्याच्यावर कळमुस्ते (हरसूल) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाला आश्रमशाळा जबाबदार असून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ञ्यंबकेश्वर येथील बसस्थानकाच्या बाजूस असलेल्या आदिवासी विकास विभागाची अनुदानित आश्रमशाळा आहे. तेथे पहिलीच्या वर्गातील निवृत्ती बाळू चावरे (वय 6) हा मुलगा सायंकाळी 6.30 च्या सुमारास आश्रमशाळेच्या खोलीत आजारी असल्याचे आढळून आल्याने त्यास अधीक्षक नंदू देवरे यांनी उपचारासाठी ञ्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल येवले यांनी तपासले असता तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. 

हरसूल, कळमुस्ते येथील बाळू चावरे या शेतमजुरास तीन मुली आणि हा एकुलता मुलगा होता. त्याच्या तीन बहिणीदेखील याच आश्रमशाळेत शिकत आहेत. होळीची सुटी संपून ते सोमवारी दुपारी आश्रमशाळेत आले होते. सोमवारी शाळेच्या खोलीत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास त्याची बहीण धावत आली व तिने निवृत्ती कसेतरी करत असल्याचे शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी धाव घेऊन त्याचे अंग तपासले असता त्याला ताप आल्याचे आढळले. त्याला तातडीने दवाखान्यात नेले, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवलेली होती. शवविच्छेदनासाठी त्याचे पार्थिव नाशिक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले व तेथून मंगळवारी कळमुस्ते गावी अंत्यसंस्कारासाठी नेले. त्याचा मृत्यू न्यूमोनियाने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. त्र्यंबक पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

एल्गार कष्टकरींची चौकशीची मागणी

विद्यार्थ्याचा अकस्मात मृत्यू घटनेची चौकशी करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांच्या मुलांसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा बळी आहे, असा आरोप एल्गार कष्टकरी संघटनेने केला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने बुधवारी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम लचके, जिल्हा सचिव जयराम बदादे, भावडू निरगुडे, तालुका उपसचिव मुरलीधर जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button