नाशिक : अपघाताच्या ‘या’ प्रकाराने सगळेच अचंबित….नेमकं काय घडलं असावं? | पुढारी

नाशिक : अपघाताच्या 'या' प्रकाराने सगळेच अचंबित....नेमकं काय घडलं असावं?

नाशिक (विंचुरी दळवीः पुढारी वृत्तसेवा

काल रात्री दहाच्या सुमारास सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड गावाजवळ एक अपघातग्रस्त कार आढळून आली. या कारचा पूर्ण चक्काचुर झालेला आहे. ही कार महामार्गालगतचा कठडा तोडून लगतच्या विहिरीला धडकली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या कार अपघाताच्या प्रकाराने सगळेच अचंबित झाले आहेत. त्याचे कारण असे की, अपघात घडला घोरवडजवळ पण, चालकाचा मृतदेह तेथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे हा अपघात…घातपात की आणखी काही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सुरुवातीला कारचालकाचा शर्ट शेजारील डोंगराच्या पायथ्याशी सापडला.  त्यानंतर कारचालकाचा मृतदेह पोलिसांना कारजवळ नव्हे तर हॉटेल जयभवानी सिन्नर महामार्ग येथे म्हणजे अपघात घडला त्या ठिकाणापासून तब्बल चार किलोमीटर अंतरावर शेडच्या अँगलला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने  कारचालकाने अपघाताचा बनाव रचून आपले जीवन संपविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, अपघाताचा बनाव करुन अशाप्रकारे आयुष्याचा शेवट करण्याची काय गरज असाही प्रश्न पडतो? मग त्याने अपघातात वाचला म्हणून अशाप्रकारे आपला शेवट केला असावा का? अशीही चर्चा आहे.

आकाश मोहन खताळे (वय 24) रा. अंबड चिंचाळे असे या कारचालकाचे नाव आहे. कारचालक हा पांढुर्ली येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता, अशी माहीती मिळत आहे.  मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. या अपघाताच्या प्रकाराने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून हा अपघात आहे की काही घातपात की आणखी काही याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button