नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उत्तरेकडून येणार्या शीतलहरींमुळे निफाडचा पार्यात पुन्हा एकदा घसरण झाली असून, शनिवारी (दि. 4) तालुक्यात 8.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे थंडीने कमबॅक केल्याने नाशिकमध्येही गारठा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात राज्यात निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली होती. नाशिक जिल्ह्यातही गारव्यात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, ढगाळ हवामान निवळल्यानंतर तसेच उत्तरेकडून येणार्या शीतलहरींचा वेग वाढल्याने जिल्ह्यातील वातावरणावर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकचा शहरातील किमान तापमानाचा पारा 11.3 अंशांपर्यंत खाली आला आहे. परिणामी हवेत गारवा निर्माण झाल्याने नाशिककर गारठले आहेत. विशेष करून पहाटे व रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवत असल्याने नागरिक उबदार कपडे परिधान करत आहेत. दुसरीकडे निफाडचा पारा 9 अंशांखाली घसरला आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यात थंडीचा कडाका निर्माण झाला आहे. द्राक्ष हंगामाच्या तोंडावर वातावरणात बदल झाल्याने द्राक्षपिकाला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे थंडीपासून बागा वाचविण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य भागांतही तापमानातील चढ-उतारामुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याचे चित्र आहे.