विजयानंतर सत्यजित तांबे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले उद्याच भूमिका...
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. दरम्यान सत्यजीत तांबे हे आपली भूमिका उद्या (दि. 4) स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली आहे.
निकाल लागल्यानंतर सत्यजित तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी जनतेचे आभार मानले. सोमवारचा दिवस होता, वर्किंग डे असल्याने मतदानाची टक्केवारी कमी झाली. अनेक लोक मतदानासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. मतदान बाद होण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळेही मताधिक्य कमी झाल्याचे तांबे म्हणाले.
या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं. माझ्या वडिलांनी गेल्या 14 वर्षापासून या मतदारसंघात कामाच्या व जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली. त्यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. माझ्या वडिलांनी जपलेल्या जनसंपर्कातूनच मी विजयी झालो आहे. तसेच, सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीत 4 फेब्रवारीला म्हणजे उद्याच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणून विजयोत्सव नाही…
काल मतमोजणी दरम्यान, “विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही, माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती.ट्विट करुन सत्यजित तांबे यांनी केली होती.
हेही वाचा :