cemetery : पिळुकपाड्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहांची होतेय अवहेलना | पुढारी

cemetery : पिळुकपाड्यात स्मशानभूमी अभावी मृतदेहांची होतेय अवहेलना

प्रशांत हिरे, पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतमधील पिळुकपाडा येथे स्मशानभूमी (cemetery) अभावी आणि पावसांच्या संततधारेमुळे मृतदेहांची अवहेलना होत आहे. त्यामुळे पिळुकपाडा येथे स्मशानभूमी उभारण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पिळुपाडा येथे एका वाहन चालकाचे आकस्मित निधन झाले. त्याचवेळी सकाळपासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायाची कशी, असा प्रश्न नागरिकांना पडला.

कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. काही जागरूक ग्रामस्थांनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेली स्मशानभूमीत स्वच्छता,आसन व्यवस्था, प्रसाधन गृह, वृक्षारोपण, दिवे, पावसाचे साठवलेले पाणी अशा सुखसोयी  उपलब्ध केलेल्या आहेत.

तालुक्यात आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात.

शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. माळेगावच्या ग्रामपंचायतीत ७ गावे समाविष्ट असून माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी, पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही.

पिळुकपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते  यशवंत वाघमारे सांगतात, “माळेगांव ग्रामपंचायत मधील ७ गावांमध्ये एकाही गावात स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेष त पावसाळ्यात आकस्मित निधन झाले तर सरण रचायला खूप अडचणी निर्माण होतात.अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी जनसुविधा अथवा ठक्कर बाप्पा योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्या स सोयीचे होईल.”

माळेगावच्या ग्रामसेविका मालती गवळी सांगतात की, “स्मशानभूमी (cemetery) शेड बांधण्याची मागणी अनेक वेळा जनसुविधा योजना, ठक्कर बाप्पा योजनेतून प्रस्ताव पाठवून मागणी करण्यात आली आहे. मात्र स्मशानभूमी न मंजूर करता सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. नवीन प्रस्ताव सादर करुन स्मशानभूमी शेड उभारून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.”

Back to top button