धुळ्यात भाजपा महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
धुळे : पुढारी वृत्तसेवा
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची हौस आता फिटली आहे. त्यांना महिला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आहेत. संविधानाने महिला आणि पुरुष असा भेद केलेलाच नाही. संविधानाचा सन्मान करतो. त्यामुळे आम्ही महिला आणि पुरुष असा भेदभाव मानत नाही, अशी टीका रविवारी,दि. 4 भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी धुळ्यात केली आहे.
धुळे येथील रामपॅलेसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यभरातील दौऱ्याची माहिती दिली. यावेळी खा. डॉक्टर सुभाष भामरे, भाजपाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील तसेच भाजपाचे नेते बबन चौधरी यांच्यासह माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, महापौर प्रदीप करपे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वापरण्यात आलेल्या वक्तव्या संदर्भात भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली आहे. ही भूमिका महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. असे त्यांनी सांगितले. भाजपाची महिला आघाडी महिला सुरक्षेच्या विषयावर काम करते. त्याप्रमाणे आता प्रत्येक बुथवर 25 महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच आगामी निवडणुकांमध्ये महिला सक्रियपणे काम करणार आहेत. त्यामुळेच लोकसभेत 45 पेक्षा जास्त तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टी आणि युती घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लव जिहाद प्रकरणामध्ये एक सक्षम कायदा असावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार असून यासंदर्भात वयात येणाऱ्या मुलींचे समुपदेशन करून त्यांना याबाबत मार्गदर्शनपर माहिती देण्यासाठी काम करावे लागणार आहे. हा विषय घरापासून तर शालेय स्तरावर देखील हाताळला जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. श्रद्धा वालकर ही सज्ञान असल्याने तिने विरोध पत्कारून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आजच्या पिढीला फ्रेंडशिपसाठी ॲपची गरज लागते. यावरून पालक आणि पाल्यांमधील संवाद हरपत चालला आहे का ,याची उजळणी करण्याची गरज असल्याचेही वाघ यांनी सांगितले. सध्यस्थितीत अल्पवयीनांना फूस लावून पळवण्याच्या प्रकार पाहता तसेच जबरीने केले जाणारे धर्मांतर यासाठी सक्षम कायदा असला पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये देखील लव जिहाद रोखण्यासाठी कायदा असावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.