Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण | पुढारी

Nashik : मी नाराज नाही, अब्दुल सत्तारांनी सांगितले गुवाहाटीला न जाण्याचे कारण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आज गुवाहाटीला पुन्हा एकदा रवाना झाला. मुख्यमंत्र्यांसह आमदार कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. कामाख्या देवी ही इच्छा पूर्ण करणारी देवी आहे. कामाख्या देवीनं इच्छा पूर्ण केली. जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. देवीवर संपूर्ण श्रद्धा आहे. आता पुन्हा जनतेच्या सुख समृद्धीसाठी चाललो आहोत.’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे, शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे मात्र या दौ-यात सहभागी झालेले नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार हे नाराज असल्याने गुवाहाटीला गेले नसावे अशी चर्चा होती. अब्दुल सत्तार हे आज गुवाहाटीला न जाता नाशिकमध्ये कृषिप्रदर्शन पाहण्यासाठी आले आहेत. यावेळी पत्रकार बांधवांशी त्यांनी संवाद साधला. आपले गुवाहाटीला न जाण्याचे कारण त्यांनी सांगितले.

आपण कुणावरही नाराज नसल्याचे सत्तार म्हणाले. नाशिकमध्ये कृषीप्रदर्शन भरले आहे त्यामुळे कृषीमंत्री या नात्याने नाशिकला मी आजचा वेळ दिला होता.  मी सर्वधर्मसमभाव मानणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता या नात्याने कधीही कोणत्याही मंंदिर, मज्जित अथवा बुद्ध विहारात मला जाणे अडचण वाटत नाही. माझी कुणावरही नाराजी नाही. 24 वर्षापासून सातत्याने नाशिकमध्ये कृषीप्रदर्शन भरवले जाते. येथून काही गोष्टी शिकून आम्ही शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करु शकतो.  नाशिक हा आगळावेगळा जिल्हा आहे. इथे अनेक नवीन प्रयोग होतात त्याचा फायदा महाराष्ट्राला मिळावा यासाठी मी आज नाशिकमध्ये आलो आहे. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे पू्र्ण महाराष्ट्र गेल्यासारखे आहे असे अब्दुल सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री आता आध्यात्माची वाट धरत आहे, मुख्यमंत्र्यांवरचा विश्वास कमी झाला आहे का?  असे विचारले असता सत्तार म्हणाले,  मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास वाढला आहे. लोकांना त्यांची काम करण्याची पद्धत आवडते आहे. नाशिकचे शिवसेनेचे 12 नगरसेवक शिंदे गटात येत आहेत असे मी वाचले, जर अशा प्रकारे शिंदे गटात इनकमिंग होत असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यावरचा विश्वास वाढू लागला आहे असेच म्हणावे लागेल. असे अब्दुल सत्तार म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button