नाशिक : चिंचखेड'मध्ये दहा ते बारा एकर ऊसाला आग, लाखो रुपयांचे नुकसान
नाशिक (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना नुकतीच घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या उसाच्या शेतावरून महावितरणची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे आगीची घटना घडली असल्याचे समजते.
या आगीत तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असल्याचे संबधितांचे म्हणणे आहे. यात मोतीराम पाटील, रंगनाथ पाटील, विष्णू मोरे, कैलास पाटील, सदाशिव पाटील, दौलत पाटील या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी कादवा कारखान्याचे माजी चेअरमन प्रभाकर पाटील यांनी केली आहे. उसाच्या क्षेत्राशेजारी असलेल्या खंडेराव फुकट यांच्या द्राक्ष बागेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ड्रिप इरिगेशनच्या नळ्या व द्राक्ष बागेच्या झाडांना मोठ्या प्रमाणात आग लागल्याने नुकसान झाले.