छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव | पुढारी

छगन भुजबळ : प्रकल्प पळवून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात आहे, ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

येवला मतदासंघात आज त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक प्रकल्प दिल्ली गुजरातला हलविण्यात आले. हे सर्व बघितलं तर दुःख होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई महाराष्ट्रात रहावी यासाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलं. तेव्हा मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे. आता याच मुंबई शहराचे महत्त्व कमी करण्याचा डाव सध्या सुरू असल्याचे टीका त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले की, राज्याच्या बाहेर प्रकल्प गेल्याने राज्यातील जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रधानमंत्र्यांकडे जाऊन याबाबत राज्याची भूमिका स्पष्ट करावी. हा प्रकल्प राज्यात कसा येईल यासाठी प्रयत्न करावे. कारण आता दुसरे कोणी हा प्रकल्प राज्यात पुन्हा आणू शकत नाही. असे सांगत पंतप्रधान हे यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सांगत आहे. हे म्हणजे लहान मुलाला छोटा नाही मोठा फुगा देतो असे आमिष दाखविण्यासारखे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा :

Back to top button