नाशिक : सरस्वती नदीपात्रातला खडतर प्रवास थांबला, शहरवासीयांतून समाधान
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सरस्वती नदीला आलेल्या महापुरामुळे सिन्नर शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. पडकीवेस भागातील पूल वाहून गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. नागरिकांना दूर अंतरावर वळसा मारून जावे लागत होते. काही पादचारी तर लांबच्या अंतरावरून दूरवरून जाण्याऐवजी ‘शॉर्टकट’ मारून जीव धोक्यात घालत नदीपात्रातून वाट काढत असल्याचे धोकायदायक चित्र पाहायला मिळत होते.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी अपना गॅरेज झोपडपट्टीच्या पाठीमागील भागात असलेल्या पडकीवेस भागातील पुलाची गंभीर परिस्थिती पाहिली. नागरिकांचा जीवघेणा प्रवास पाहून स्वखर्चातून या मार्गावर तातडीने लोखंडी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री पडकीवेस भागात तातडीने या पुलाची उभारणी करण्यात आली. रविवारी सकाळपासून नागरिकांनी या पुलावरून आपला प्रवास सुरू केला.
माजी आमदार वाजे यांनी वेळीच गंभीर प्रकाराची दखल घेऊन नागरिकांची गैरसोय व त्या ठिकाणचा जीवघेणा प्रवास थांबवला. कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता तातडीने स्वखर्चातून लोखंडी पुलाची उभारणी करून नागरिकांची गैरसोय दूर केल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.