नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने | पुढारी

नाशिक : कौटुंबिक सुखशांतीच्या नादात गमावले तीन तोळे सोने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परिवारातील सदस्यांचे आरोग्य, स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच सुखशांती येण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने एका महिलेने तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली. पूजा करताना मातीच्या भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून महिलेने दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एका महिलेने पखाल रोडवरील एका कुटुंबास लक्ष करून पूजा करण्याच्या बहाण्याने गंडा घातला. अफरोज अकिल शेख (42, रा. साहिल पार्क, पखाल रोड) यांच्या फिर्यादीनुसार, जुलै ते 30 ऑगस्टदरम्यान रिहाना नामक महिलेने गंडा घातला. संशयित रिहाना हिने अफरोज यांच्यासह एस. शेख या महिलेस चांगले आरोग्य व कुटुंबात सुखशांती मिळवून देण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगितले. पूजेसाठी काही सोन्याचे दागिने लागतील, असे दोघींना सांगितले. 29 ऑगस्टला एस. शेख यांच्या घरात पूजा करण्यात आली. पूजेसाठी आणलेले तीन तोळ्याचे दागिने रिहानाने मातीच्या वाटीत बंद करून बेडरूममधील कपाटात ठेवण्यास सांगितले. शेख यांनी दुसर्‍या दिवशी मातीची वाटी उघडून पाहिले असता त्यात दागिने नसल्याचे पाहताच धक्का बसला. अफरोज शेख यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात रिहानाविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. संशयित महिला फरार असून, पोलिस तिचा शोध घेत आहे.

असहायतेचा गैरफायदा
नागरिकांच्या अज्ञानपणाचा, भीती दाखवून, असहायतेचा गैरफायदा भामटे घेत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांत भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना लक्ष करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने नेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यात एका घटनेत दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी दागिने लंपास केले. एका टोळीने नागा साधू बनून, तर एकाने तोतया पोलिस बनून ज्येष्ठ नागरिकांकडील सोन्याचे दागिने नेले आहेत.

कशी घ्याल काळजी
घराबाहेर पडताना दागिने शक्यतो पदराखाली झाकून ठेवावेत. मॉर्निंग वॉक किंवा रात्री फिरताना दागिने घरातच ठेवावे. पॉलिश करून देतो असे सांगणार्‍यांना दागिने देऊ नका. पोलिस कधीही दागिने खिशात ठेवा, असे सांगत नाही. त्यामुळे कोणी असे सांगितल्यास सावध राहा व त्याच्याकडे ओळखपत्र विचारा किंवा आरडाओरड करून नागरिकांना बोलवा. अनोळखी व्यक्तींसोबत निर्जनस्थळी किंवा एकांतात संवाद साधू नका. संशय आल्यास 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिस मदत मागवा.

हेही वाचा:

Back to top button