नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना योग्य स्थान देण्यात येईल. निकषाप्रमाणे जेवढे देणे आवश्यक आहे, ते महिलांना दिले जाईल. किंबहुना त्यापेक्षाही अधिक देताना बॅकलॉग भरून काढण्यात येईल, असा विश्वास राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. येत्या एक ते दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित होतील, असे सांगताना, मी अजून तरी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री नसल्याचे स्पष्ट केले.
विभागीय आयुक्तालयात सोमवारी (दि. 15) ध्वजारोहण सोहळ्यानंतर ना. महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खातेवाटपात शिंदे गटाला दुय्यम खाती मिळाल्याने नाराजी असल्याबाबत महाजन यांना विचारले असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. खातेवाटपावरून शिंदे गटात कोणाचीही नाराजी नसून ना. दीपक केसरकर यांनीही नंतर स्पष्टीकरण दिल्याचे ना. महाजन म्हणाले. दोन-तीन दिवस हे थोडेफार चालेल. सर्वांनी आपला कार्यभार हाती घेतला की, कामाला सुरळीत सुरुवात होईल, असे सांगताना, कुठेही नाराजीचा सूर राहणार नाहीे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने चांगले खाते स्वत:कडे ठेवले असे काही नाही, तर खाते कुठलेही असू द्या, आपण प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने काम केले पाहिजे. त्याचा लाभ आणि उपयोग जनतेला आणि राज्याच्या विकासासाठी कसा होईल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. खाते दुय्यम आहे, तिय्यम आहे, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही, असा सल्ला यावेळी ना. महाजन यांनी सहकारी मंर्त्यांना दिला. मंत्रिमंडळाचा अजूनही निम्मा विस्तार बाकी आहे. त्यामुळे त्यातून नाराजी दूर होऊन आम्ही पुढील अडीच वर्षे राज्याचा कारभार यशस्वीपणे चालवू, असा विश्वास ना. महाजन यांनी व्यक्त केला.