नाशिक, पुढारी ऑनलाईन: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आम्हाला काळजी वाटते. त्यांची तब्येत बरी नसते. त्यांचे मन:स्वास्थ्य बिघडले आहे. त्यामुळे त्यांची काळजी त्यांच्या दोन्ही मुलांनी घ्यावी, अशी उपरोधिक टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (#sanjay raut) यांनी केली.
दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांना अटक केल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. राणे सध्या सिंधुदुर्गमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढत असून ही यात्रा उत्तररोत्तर टिकेमुळे चर्चेत आहे.
संजय राऊत (#sanjay raut) नाशिकमध्ये आले असता ते म्हणाले, 'नारायण राणे यांच्यावर ज्या दिवशी नाशिक पोलिसांनी अटकेची कारवाई केली, त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली होती.
त्यांना रक्तदाब व शुगर वाढली होती. डॉक्टरांकडून त्यांची तपासणीही करण्यात आली.
जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राणे यांनी रुग्णालयात जाऊन तपासणीही करून घेतली होती.त्यांची प्रकृती बरी नसते.
त्यांचं मन:स्वास्थ्य बिघडलेले आहे. त्यांच्या मुलांनीही त्यांची काळजी घ्यायला हवी. त्यांना फार त्रास देऊ नये,'
'नारायण राणे यांच्या प्रकृतीची काळजी आम्हालाही वाटते. अशा माणसाला आधाराची गरज असते.
त्यामुळं त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून शिवसैनिकांनी रोज सकाळी एक मिनिटाची प्रार्थना करावी, असं आम्ही लाखो शिवसैनिकांना सांगणार आहोत.
भाजपनंही प्रार्थना करायला हवी. मी मुख्यमंत्र्यांशीही याबाबत बोलणार आहे,' असेही राऊत म्हणाले.
'आम्ही स्वत: देखील राणेंना उपचार सुचवू शकतो. त्यांनी योगा करावा. विपश्यना करावी,' असा सल्लाही त्यांनी दिला.
'भाजप आणि शिवसेनेचे २५ वर्षांपासून नाते आहे. ते नाते एका व्यक्तीने बिघडवले.
आज नारायण राणे जे बोलत आहेत ते फडणवीस, पाटील, शेलार बोलू शकत नाहीत, म्हणूनच त्यांनी राणेंना बोलायला पुढे केले आहे.
पण राणे यांनाही नंतर पश्चात्ताप होईल. आपला वापर केल्याचे लक्षात येईल.' असे राऊत म्हणाले.