

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेचे १८ पैकी १२ खासदार आणि २० माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. काही खासदारांना आपण भेटलो असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे गटात जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. तब्बल १३ दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले होते. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. बंड का केले त्याचे कारणही त्यांनी सांगितले. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
आमदार पाटील म्हणाले, आम्ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला. विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो आहोत. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला मिळेल, असा दावा पाटील यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. उलट शिवसेना आम्ही वाचवली आहे. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे, ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत. उद्धव ठाकरे यांना फसवले असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावे, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
हेही वाचलंत का ?