

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारकडून तयार केल्या जात असलेल्या ओबीसी समाजाच्या इम्पिरिकल डेटामध्ये चुका आहेत, हे उशिरा का होईना कबूल करणार्या छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मंत्रिपदाचे वजन वापरून हा डेटा अचूक होण्यासाठी आता तरी प्रयत्न करावेत. नाहीतर तुमचे मंत्रिपद बिनकामाचे आहे हेच सिद्ध होईल, अशी टीका भाजप प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
आ. फरांदे म्हणाल्या की, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत गेल्या तीन वर्षांपासून हे सरकार वेळ काढत आहेत. मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातो आहे, अशी कबुली दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे बरोबरच आहे, असेही भुजबळ, वडेट्टीवार म्हणत आहेत. असे असेल तर हे मंत्री सरकारमध्ये बसून करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. सरकारमध्ये असूनही इम्पिरिकल डेटामध्ये अशा चुका होत असतील या नेत्यांचा ओबीसी समाजाला उपयोग नाही.
मागासवर्गीय आयोग तुमच्या सरकारच्या अधिकारात काम करत आहे, मग एवढ्या मोठ्या चुका कशा होतात? याचा अर्थ सरकारच्या सांगण्यावरूनच या चुका होत आहेत. आयोगाला राज्यात दौरे करायला सांगण्याची गरज नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी आदेश दिला, त्याच दिवशी इम्पिरिकल डेटा तयार करण्याचे काम सुरू व्हायला पाहिजे होते. ते तर झालेच नाही, पण आता आडनावावरून डेटा तयार केला जात आहे. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.