Murder : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, नाशिकच्या जलालपूर शिवारातील घटना | पुढारी

Murder : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून, नाशिकच्या जलालपूर शिवारातील घटना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेतीच्या वादातून सख्ख्या भावाने शेतीच्या बांधावरच भावाच्या डोक्यात टिकाव मारत त्याचा खून केल्याची घटना नाशिक तालुक्यातील जलालपूर शिवारात घडली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळवंत कोंडाजी शेळके (57, रा. यशवंतनगर, मुंगसरा) असे मृत्युमुखी पडलेल्या भावाचे नाव आहे. शेतीवरून बळवंत व त्यांचा भाऊ श्रीहरी कोंडाजी शेळके (60) यांच्यात वाद सुरू होते. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. गुरुवारी (दि.16) सकाळी 11.30 च्या सुमारास याच वादातून दोन्ही भावांमध्ये हाणामारी झाली. त्यात बळवंत यांच्यावर श्रीहरी यांच्यासह त्यांचा मुलगा जयदीप श्रीहरी शेळके (35) यांनी हल्ला करीत टिकावाने डोक्यात वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय व भाऊ यशवंत शेळके यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसांनी हल्लेखोर पुतण्या जयदीप यास ताब्यात घेतले असून, श्रीहरी व त्यांची पत्नी हे जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बळवंत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना असा परिवार आहे. बळवंत शेळके हे पाटबंधारे खात्यात शिपाई म्हणून कार्यरत होते.

हेही वाचा :

Back to top button