नाशिक : निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य : मुख्यमंत्री | पुढारी

नाशिक : निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्व जण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्य सरकारतर्फे पर्यावरणदिनी माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हा स्तरावरील अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. एकत्रित काम केल्यास कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘माझी वसुंधरा अभियान’ आहे. विकास हा झालाच पाहिजे, परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे 200 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करताना पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजा करण्याची ग्वाही दिली. तर स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रुजून आपली संस्कृती बनली पाहिजे, अशी अपेक्षा ना. थोरात यांनी व्यक्त केली. दरम्यान, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे प्रतिपादन ना. आदित्य ठाकरे यांनी केले.

यांचा झाला सन्मान
माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत उत्कृष्ट कामाबाबत नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे व विद्यमान जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय विभागात चांगले कार्य करणारे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button